Tuesday, July 21, 2020

शिक्षा


गेल्या आठवड्यापासून सतत बेचैन मनस्थितीत होता तो. काही समजत नव्हते त्याला. आपल्या भविष्याचे तारू कोठे जाणार हेच त्याला उमगत नव्हते. सततच्या बेचैनीला तो सुद्धा कंटाळून गेला होता. शेवटी काय होईल त्याला सामोरे जायचे असे मनाला सतत समजावीत होता. गेली तीन वर्षे नुसती फरपट सहन करत होता तो. असल्या जगण्यापेक्षा मरण बरे असे वाटे त्याला. त्या मरणाचीच वाट पाहत होता तो. स्वतःचा खूप राग येत होता त्याला.

"च्यायला, वैताग आलाय नुसता या जगण्याचा. " असे म्हणून पचकन थुंकला तो . आयुष्य कधी कुणाला कसे घेऊन जाईल काही सांगता येत नाही. त्याच्याही आयुष्याची कथा काही वेगळी नव्हती. तीन वर्षापूर्वीचे त्याचे आयुष्य आतापेक्षा खूपच वेगळे होते. किंबहुना खूप छान होते. गरिबी होती , कष्ट होते पण वेळेला दोन घास आणि महत्वाची म्हणजे सुखाची झोप होती. पण आयुष्यात आलेल्या त्या वादळानंतर त्याची नुसती फरफटच  झाली होती. तीन वर्षे स्वतःला कोसत होता तो. एकही रात्र नीट डोळ्याला डोळा लागला नव्हता त्याच्या.

"ए, हि घे कापडं अन तयार हो लवकर. कोर्टात जायचंय." तुरुंग रक्षकाने कपडे दिले...दिले कसले फेकले अंगावर. ह्याने गपचूप आपले कपडे घातले आणि तयार झाला. त्याला नंतर कोर्टात नेण्यासाठी गाडी आली. अजूनही काही कच्चे कैदी होते त्याच्या बरोबर.

काही ना बोलता हा आपला ऐकत होता सर्वांच्या गप्पा. आज कोर्टात काय होणार हाच विचार डोक्यात चालला होता. टेन्शन वाढत होते त्याचे. तीन वर्षांपूर्वीच्या त्या घटनेने आयुष्य इतके बदलेल हे त्यालाच काय त्याच्याबरोबरच्या कुणालाही वाटले नव्हते.

गाडीने कचकन ब्रेक मारला अन त्याची तंद्री भंगली. त्याला कोर्टात नेण्यात आले. कोर्टात बरीच वर्दळ होती. आजूबाजूच्या पोलीस स्टेशनमधले कैदी सुद्धा आणले जात होते. पक्षकार तसेच वकिलांची धावपळ चालू होती. टाइपरायटरची खडखड ऐकू येत होती. त्याला न्यायालयाच्या एका दालनात नेण्यात आले आणि दालनाच्या शेवटी असलेल्या कैद्यांसाठीच्या राखीव जागेत बसवण्यात आले. बरोबरचे कैदीही त्याच जागेत बसले आणि कुजबुज करू लागले .

"साला क्या लाईफ है !" बाजूचा एक कैदी करवादला. ह्याने नुसतेच त्या कैद्याकडे बघितले. "कब खतम होगा ये फालतुगिरी पता नै. खालीपिली टाइम खोटी किया. मान तो लिया सबकुछ. अब जल्दी से सजा भी दे दो  यार." असे म्हणून त्या कैद्याने याच्याकडे पहिले अन विचारले ," तुमभी कोई कांड किया लगता है. "
याने काही उत्तर नाही दिले.
 " नये हो?" त्या कैद्याने विचारले तरी हा काहीच बोलला नाही. शून्य नजर लावून न्यायाधीशांच्या खुर्चीच्या मागे असणाऱ्या गांधीजींच्या तसबिरीकडे शून्य नजर लावली होती याने.

" भाई , टेन्शन मत लो ... छुट जाओगे". " मैभी आजहीच छुटूंगा शायद . अपने  वकीलने सेटलमेंट किया है सामनेवाले पार्टी से. खाली मारामारी किया तो हाफ मड्डर का चार्ज लगाया  सालोने. खाली बुंदभर खून निकला होगा उसका . साला मेरे बेटेको चमाट मारा तो धोया साले को."

हा मात्र कंटाळला होता त्या कैद्याची बडबड ऐकून. "ऐकणाऱ्याला रस नसेल तर का बोलतात हे कुणास ठाऊक.!, वयाने मोठा आहे म्हणून काही बोललो नाही आणि असेही बोललो नसतोच म्हणा." मनातल्या मनात हा स्वतःशीच बोलू लागला.

एवढ्यात सर्वजण उभे राहिले. हा देखील उभा राहिला. जज्जसाहेबांनी दालनात प्रवेश केला आणि सर्वांना बसण्याचा निर्देश केला. जज्ज आले तसे याच्या छातीमध्ये कालवाकालव झाली. आज काय होणार या विचाराचे पुन्हा त्याला टेन्शन आले.

कोर्टाचे कामकाज सुरु झाले. वकील आणि पक्षकार यांच्या साक्षी सुरु झाल्या होत्या. आपली केस लवकर न यावी अशी हा प्रार्थना करत होता.

तेवढ्यात त्याच्याच नावाचा पुकारा झाला. त्याला आरोपीच्या पिंजऱ्यात नेण्यात आले.

आज खरेतर त्याच्या खटल्याची सुनावणी होणार होती. सर्वांचे डोळे त्याकडे लागले होते. याच्या तर सर्व आशाच संपुष्टात आल्या होत्या. अशीही तीन वर्षे शिक्षा झालीच होती. तीन वर्षांपूर्वीचा तो दिवस त्याला आठवला.

"अरे आरिफ, मत जा किधर , तेरा वो जिजा क्या करता है तेरेको नय मालूम. मत जा उके पास . खालीपिली फस जायेगा एक दिन उसके नाद में . " अब्बू बोलत होते पण ह्याचे काही लक्ष नव्हते. त्याच्या जिजाने म्हणजेच हमजा ने त्याला दुबईला पाठवायचे कबुल केले होते. खरे तर हमजा हा आरिफच्या बहिणीचा म्हणजेच निलोफरचा नवरा. पण खूप आतल्या गाठीचा,एकदम निष्ठुर माणूस. दुबईच्या कुठल्याशा भाईशी त्याचे सख्य होते. म्हणजे त्या भाईची आयातनिर्यात हमजा सांभाळत असे. आता हि आयातनिर्यात कसली होती हे आरिफला नक्की ठाऊक नव्हते कारण तो कोल्हापूर ला त्याच्या आज्जीकडे राहायला होता. गेले एक वर्षच  झाले होते त्याला मुंबईत येऊन.

निलोफर त्याची पाठची बहीण. तिचा खूप जीव होता आरिफवर . पण आरिफ तिच्या नवर्याकडे कामासाठी येतो हे तिला आवडत नसे. तिचा प्रेमविवाह झाला होता हमजाशी. अब्बू परवानगी देत नव्हते तर निलू पळून गेली होती हमजाबरोबर . शेवटी अब्बून्नी तिला शोधून आणून तिचा निकाह लावला. पण आता मात्र निलू स्वतःला दोष देत होती कारण तिला हमजाचा व्यवसाय ठाऊक झाला होता.

 निलू तिच्या परीने आरिफला समजावत असे पण नवऱ्याची बदनामी ना करता . कारण हमजा तिला नंतर बेदम मारेल हि खात्री होती तिला.

त्या दिवशी अब्बू नको म्हणत असताना तो हमजाकडे गेला. त्यावेळी हमजाकडे कोणीतरी बाहेरचा खास पाहुणा आला होता बहुधा. पण बरेच लोक दिसत होते. त्यांच्याकडे शस्त्र सुद्धा असावे कदाचित. तो पाहुणा गेला तरी आरिफला हमजाने बाहेरच उभे केले होते. आत कसली खलबते चालली होती कुणास ठाऊक पण प्रकरण गंभीर असावे हे निश्चित. नेमकी त्या दिवशी हमजाच्या ऑफिसवर पोलिसांनी धाड टाकली आणि आरिफ तिथे असल्याने पोलिसांना सापडला. हमजा पळून जाण्यात यशस्वी ठरला पण आत्याचं दुसरा साथीदार इसाक मात्र पोलिसांच्या हाती लागला. आरिफला नंतर कळले कि हमजाच्या ऑफिसमध्ये बॉम्बसाठी लागणारी स्फोटके सापडली. बॉम्बस्फोटाचा कट रचल्याबद्दल आणि स्फोटके बाळगल्याबद्दल आरिफला अटक करण्यात आली होती. एका दिवसात होत्याचे नव्हते झाले होते.

त्या दिवसाबद्दल आरिफ स्वतःला अजूनही दूषण देत होता. काही चूक नसताना त्याची यात फरफट झाली होती. एक शिकलेला उमदा तरुण एका दिवसात दहशतवादी ठरला होता... ते पण निर्दोष असून.

खटला किती चालेल हे त्याला काही माहित नव्हते. सुटला नाही तरी किमान काही दिवसांसाठी जामिनावर सोडले तरी चालेल पण घरी जायचे होते त्याला. अम्मी -अब्बूची भेट घ्यायची होती त्याला. पण हमजा जो पर्यंत सापडत नाही तो पर्यंत याची निर्दोष मुक्त होण्याची शक्यता नव्हतीच. आणि हमजा तर दुबईला पळाला होता. त्याला आरिफशीच काय पण नीलूशीही काही घेणेदेणे नव्हते.

"आरिफ खान, तुम्हाला काही सांगायचंय? " जज्जसाहेबांचा आवाज घुमला.

"अं ??? " आरिफ भानावर आला. "हेच सरकार कि माझी यात काही चूक नव्हती. मी फक्त माझ्या जिजा ला भेटायला तिकडे गेलो होतो. "

"ठीकाय".

आणि जज्जसाहेबांनी निकाल सांगायला सुरुवात केली. बाकी काही आरिफ ला कळले नाही पण त्याला पुराव्याअभावी निर्दोष मुक्त करण्यात येत आहे हे ऐकल्यावर मात्र त्याच्या डोळ्यात अश्रू आले. तीन वर्षांची फरफट आज संपणार होती.

सर्व कायदेशीर सोपस्कार पार पडल्यानंतर तो घरी जायला निघाला. समोरच कोपऱ्यात त्याचे अब्बू उभे होते. त्यांची आरिफशी नजरानजर झाली आणि ते हमसून हमसून रडू लागले. आरिफने जाऊन त्यांना घट्ट मिठी मारली अन म्हणाला," अल्लाह आहे अब्बू,अल्लाह आहे. या खुदा तू मला निर्दोष मुक्त केलेस. अब्बू, पुन्हा नाही तुमचा शब्द मोडणार मी. तुम्ही आणि अम्मी म्हणाल ते करीन , कष्ट करेन आणि खूप पैसे मिळवीन आणि तुम्हाला दोघांना खूप सुखात ठेवीन अब्बू. कसमसे."?

आज कोर्टाच्या आवारात पाऊस नसतानाही श्रावणधार बरसात होती पण सुटकेच्या भावनेची आणि प्रेमाची.

Thursday, March 5, 2020

समारोप - कूर्ग डायरीज

समारोप - कूर्ग डायरीज

इतके दिवस छान झालेला हा प्रवास आता संपणार म्हणून मन थोडे नाराज झाले असले तरी सकाळी उठून आमच्या रिसॉर्ट च्या बाजूलाच असलेले कावेरी नदीचे सुंदर पात्र पाहून खूप मस्त वाटले. सकाळी चहा घेऊन आम्ही सगळे नदीवर गेलो. थंडी होतीच तरीही मुली मात्र पोहोण्यास उत्सुक होत्या. मग काय त्यांना पाण्यात सोडले आणि मस्त डुंबू दिले. बाहेर आल्यावर खूप कुडकुडत होत्या. मग चहा घेऊन सर्व विधी आटोपून नाश्त्यासाठी असलेल्या दालनामध्ये गेलो. तिथेच रिसॉर्टच्या मालकांशीही भेट झाली.




श्री. सुब्रमणि के. हे खरेतर एक नावाजलेले कृषी संशोधक. कर्नाटक सरकारने अनेकविध पुरस्कार देऊन त्यांना सम्मानित केले आहे. हे मूळचे मराठीच आणि मराठी भाषाहि छान बोलतात. एकदम प्रसन्न व्यक्तिमत्व. योग धाम हा त्यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प. त्यांनी सुमारे पंधरा वर्षांपूर्वी श्रीरंगपट्टण येथे ५ एकर जमीन घेऊन या प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली.

येथे गरीब मुलींना दहावी नंतरचे शिक्षण मोफत देण्यात येते. खरेतर सुब्रमणि सरांची हि संस्था म्हैसूर विश्वविद्यालयाशी संलग्न आहे. त्यामुळे दहावी नंतर येथे बारावी आणि पदवी परीक्षा वाणिज्य शाखेतून देता येते. तसेच याबरोबर सर्व मुलींना वेद, उपनिषद, योग यांचे शास्त्रोक्त शिक्षण देण्यात येते.

हे रिसॉर्ट पूर्णतः संस्थेतील मुलीच चालवतात. येथे मुलींना इंग्लिश आणि संस्कृतमध्येच बोलणे बंधनकारक आहे. या सर्व मुलीसुद्धा खूप छान पद्धतीने रेसॉर्टचे व्यवस्थापन सांभाळतात. खरेच श्री सुब्रमणि यांचे कार्य खूपच स्तुत्य आणि मोठे आहे. इतक्या उदात्त हेतूने संस्था चालवताना त्यांचे कृषी संशोधन सुद्धा चालू असते.

अश्या या मोठ्या पण विनम्र व्यक्तिमत्वाशी परिचय झाला, त्यांच्याशी बोलता आले हेही नसे थोडके.
इथे येणारे पर्यटक मुख्यतः योगाभ्यास करण्यासाठी येतात. निसर्गाच्या सान्निध्यात असलेले हे टुमदार रिसॉर्ट योगाभ्यासाइतकीच मन:शांती देते. कावेरीची खळाळते पात्र आणि योगविद्या यांची अभूतपूर्व सांगड घालणाऱ्या सुब्रमणि सरांना खरेच साष्टांग दंडवत.

छानपैकी मस्त इडली आणि चटणीचा बेत नाश्त्यासाठी होता. नाश्ता अक्षरश: हादडून आम्ही तिथून निघालो नदीकिनारी फेरफटका मारण्यासाठी. आज आमचा कर्नाटकातील मुक्कामाचा शेवटचा दिवस असल्याने आम्हाला सर्व तयारी करून एयरपोर्ट ला निघणे क्रमप्राप्त होते. आमची फ्लाईट सव्वा सहाची होती. त्यामुळे किमान चार वाजता आम्ही बेंगळुरू विमानतळावर पोचण्याचे ठरविले आणि योगधाम मधील सर्वांचा निरोप घेऊन आम्ही निघालो.

बेंगळुरू विमानतळावर येण्यास आम्हाला साडेतीन पावणेचार वाजले.  प्रवासातच पोटोबा झाला असल्याने आम्ही निश्चिन्त होतो. चार वाजता चेक इन केले आणि विमानाची वाट पाहू लागलो. साधारण सव्वासहाला फ्लाईट बोर्डिंग केले आणि सज्ज झालो भारताच्या आर्थिक राजधानीमध्ये परतण्यासाठी.

--समारोप.


( ता.क. - काही काम निमित्त कूर्ग डायरीज या मालिकेचा शेवट होण्यास उशीर झाला त्याबद्दल सर्व वाचकांशी क्षमा मागतो. आपले प्रेम असेच कायम राहो अशी इच्छा बाळगतो आणि या मालिकेचा समारोप करतो. धन्यवाद )


( प्रकाशचित्रे आंतरजालावरून साभार )













Tuesday, March 3, 2020

कूर्ग डायरीज ६

कूर्ग डायरीज ६

कूर्गला निरोप :

आज आमचा कूर्ग मधील शेवटचा दिवस. वेळ कसा पटकन निघून गेला हे कळलेच नाही. आमच्या या प्रवासात पर्यटनाबरोबरच आराम हे सुद्धा आमचे दुसरे ध्येय होते. वेळेअभावी बरीचशी स्थळे जरी या प्रवासात पाहता आली नसली तरीही त्याचे शल्य तितकेसे मनाला टोचत नव्हते कारण ज्या स्थळांना आम्ही भेट दिली होती ती एकतर खूपच छान होती आणि त्यांना भेट देण्याचा अनुभव एकदम पैसे वसूल होता. कूर्ग हे स्थळ पुन्हा पुन्हा पाहण्यासारखे आहे यात शंकाच नाही. इथल्या निसर्ग सौंदर्याने अगोदरच मनावर गरुड केले होते. त्यात दाक्षिणात्य जेवणही अप्रतिम. त्यामुळे कुर्गचा निरोप घेणे कसेसेच वाटत होते. पण पर्यायही नव्हता.

सकाळी लवकरच दिवसाची सुरुवात केली. मुलींनाही लवकर उठवलं. सर्व सामान बांधून तयार झाल्यावर नाश्त्यासाठी खाली आलो. कुर्गमधील किंबहुना प्रशांती रेसॉर्टमधील शेवटचे डोसे आणि इडली-वडा मनसोक्त हादडून चेक आउटचे सर्व सोपस्कार पार पडले आणि गाडीमध्ये बसून पुढील प्रवासासाठी सज्ज झालो.

सकाळचे साधारण नऊ वाजले होते. कुर्गच्या आल्हाददायक हवेचा निरोप घेताना मनाला थोडे क्लेश झालेच. आज आम्ही म्हैसूर मार्गे श्रीरंगपट्टण ला जाणार होतो. खरेतर आम्ही डायरेक्ट बेंगलोरलाच निघणार होतो पण प्रवासाची दगदग एकाच दिवसात होऊ नये म्हणून कूर्ग मधील मुक्काम एका दिवस कमी करून श्रीरंगपट्टणला राहणार होतो. श्रीरंगपट्टण ला प्रशांती रेसॉर्टचे मालक यांच्या बंधूंचे योगा धाम रिट्रीट नावाचे एक रिसॉर्ट आहे. त्याबद्दल आम्हाला आमच्या चालकाने सांगितले होतेच. आता उत्सुकता होती म्हैसूर दर्शनाची.

म्हैसूरला पोचायला साधारण चार तास लागलेच. पोचल्यावर पहिला पोटोबा उरकून घेतला. भुकेल्या पोटी लष्कर चालत नाही त्यात आम्ही काय चालणार ?  पोटोबा नंतर थोडी खरेदी केली. आमचा चालक प्रकाश आज आम्हाला म्हैसूर पॅलेस दाखवणार होता. त्यानंतर प्राणिसंग्रहालय पाहण्याचा बेत होता. पण प्राणिसंग्रहालय पाच वाजता बंद होते असे कळले त्यामुळे म्हैसूर पॅलेस लांबूनच पहिला आणि प्राणिसंग्रहालय पाहायला गेलो. अपेक्षेप्रमाणे गर्दी होतीच पण मुली खुश होत्या.


तिकीट काढून आत शिरलो आणि सुरु झाला एक अविस्मरणीय अनुभव. आजवर आम्ही फक्त मुंबईतील वीर जिजामाता उद्यान हे एकमेव प्राणी संग्रहालय पाहिले होते. त्यामुळे इथे कोणकोणते प्राणी, पक्षी व वनस्पती पाहायला मिळणार याचे कुतूहल होते.

सुरुवातीच्या पिंजऱ्यांमध्ये प्रामुख्याने पक्षीच होते. त्यामध्ये मोर, करकोचा, विविधरंगी पोपट, कोंबडीच्या निरनिराळ्या प्रजाती, बदके, सफेद मोर असे विविध पक्षी होते. पक्ष्यांचा राजा गरुड तसेच घुबडासारखा पक्षी पाहून खरेच कुतूहल चाळवले गेले.  त्यातच लांबवर उभ्या असलेल्या खऱ्या अर्थाने राजबिंडा भासणाऱ्या आफ्रिकेतील मूलनिवासी जिराफाचे दर्शन झाले. पण ते खूपच लांब असावे कदाचित एक्झिट जवळ असावे.

जसजसे आम्ही पुढे जात होतो तसतसे नवनवीन प्राणी नजरेस पडत होते. आणि अश्यातच अतिचपल अश्या चित्त्याचे मनोहर रूप समोर आले. अवघ्या काही फुटांवर असलेला हा अप्रतिम सौष्ठव लाभलेला प्राणी अतिशय सुंदर दिसत होता.



या झूमध्ये माकडांच्याही अनेक प्रजाती आहेत. उदा. चिम्पान्झी. मानवाच्या मूळ रूपाचे दर्शन सुद्धा खरेच विलोभनीय होते. इथे हरीण, सांबर काळवीट यासारखे प्राणीही गुण्यागोविंदात राहतात. मग दिसतो वाघोबा. इथे तांबडा आणि पांढरा (रस्सा नाही बरं का !) असे दोन्हीही प्रकारचे वाघ पाहावयास मिळतात.

पांढरा वाघ

तांबडा वाघ

मांजरीच्या भाच्याचे दर्शन घेण्यात इतके गुंग झालो होतो की आजूबाजूचा पूर्ण विसर पडला होता. इतक्यात एक गगनभेदी डरकाळी कानावर पडली.... वनराजाची. वनराज सिंह आपल्याच तोऱ्यात फेऱ्या मारत होता. थकून जेव्हा एका ठिकाणी तो बसला तेव्हा कुठे फोटो काढायला फुरसत मिळाली आणि मग क्लीकक्लीकाट केला.

वनराज सिंह


देवाच्या या अप्रतिम निर्मितीला मनातच सलाम ठोकला. खरेतर सिंहापेक्षा वाघ नेहमी चपळ भासतो आणि असतो सुद्धा. सिंह कायम आळसावलेला दिसतो पण तरीही त्याच्या रूपात एक प्रकारचे खानदानी राजेपण दिसते जे पाहणाऱ्याला मंत्रमुग्ध करते. वाघ रागीट तर सिंह स्थितप्रज्ञ भासतो आणि चित्ता एकदम कपटी वाटतो मला.

पुढे ओव्हरकोट घातलेल्या एकशिंगी गेंड्याचे आणि पाणघोड्याचे सुद्धा दर्शन झाले. पण आम्हाला उत्सुकता होती. जिराफाच्या पुनर्दर्शनाची. पण ते एक्झिटजवळ पाहायला मिळतील असे कळले. आता नाही म्हटले तरी दोन तास होऊन गेले होते. तरीही खास थकावट वाटत नव्हती याला खरे कारण म्हणजे या उद्यानात ठिकठिकाणी विश्रांतीसाठी बसण्याच्या जागा तसेच प्रसाधनगृहे होती. इतके सुंदर नियोजन खूप कमी ठिकाणी पाहायला मिळते.

जिराफ़दर्शनाच्या आशेने जात असताना मध्येच झेब्रा दिसला. हा एक प्राणी खूप छान दिसतो. मुलींनी हा प्राणी प्रथमच प्रत्यक्ष पाहिला होता.
एकशिंगी गेंडा




येथे सरपटणाऱ्या प्राण्यांसाठी एक खास दालन आहे. हत्तीचे सुद्धा दर्शन झाल्याने मुली खुश झाल्या.हत्तीला पाहून  त्यांना गणपती बाप्पाची आठवण झाली. पाण्यात डुंबणारे आणि अजस्त्र लाकडी ओंडके उचलणारे हत्ती पाहून नजर तृप्त झाली.

आता एक्झिटपाशी येऊन पोचलो आणि जिराफाचे पुनर्दर्शन झाले. खरंच किती राजबिंडे रूप. अगदी डोळ्यातही  न मावणारी उंची लाभलेला हा सुंदर प्राणी आपल्याच विश्वात असल्यासारखा वावरत होता.



अतिसुंदर असा अनुभव घेऊन बाहेर आलो . आता थकवा जाणवत होता म्हणून पहिला चहा घेतला आणि श्रीरंगपट्टण ला प्रयाण केले. एव्हाना अंधार पडला होता. म्हैसूर पासून अवघ्या १५ ते २० किमी वर असलेले श्रीरंगपट्टण शहर खरेतर टिपू सुलतानाचे. आमचे रिसॉर्ट खरेतर एका गावात होते. हमरस्त्यापासून आत असेलेले हे रिसॉर्ट आम्ही पोचलो तेव्हा अंधारात गुडूप झाले होते. आम्ही चेक इन केले तेव्हा खूपच सामसूम होती. आमच्या चालकाला परिचित असल्याने त्याने तिथल्या केयरटेकर नीरज ला बोलावून खोली उघडून दिली. 

अंधार असला तरी पाण्याचा आवाज येत होता म्हणजे जवळच कुठे तरी नदीचा प्रवाह असावा. म्हणजे नक्कीच हे स्थान निसर्गरम्य असणार यात शंका नव्हती. चेक इन करून मस्त अंघोळ केली व जेवणासाठी हायवेवरील हॉटेल गाठून मस्तपैकी पोटपूजा केली.आजचा दिवससुद्धा सुंदर गेला होता म्हणून मनोमन त्या जगन्नियंत्याचे आभार मानले आणि पुढील प्रवासासाठी प्रार्थना केली. उद्याचा दिवस आमचा या सहलीतील शेवटचा असणार होता.उद्या यावेळी आम्ही नववर्षाचे स्वागत करण्यासाठी मुंबईत असणार होतो. त्यामुळे मनात मिश्रा भावना होती. रूम वर आलो तेव्हा रात्रीचे नऊ वाजले होते. खूप प्रवासाने थकलो होतो म्हणून मस्त ताणून दिली.
















Monday, January 13, 2020

कूर्ग डायरीज ५

कूर्ग डायरीज ५


दिवस दुसरा :

पहिला दिवस तर छानच गेला होता त्यामुळे कूर्ग सहलीत आणखी काय काय पाहायला मिळणार याची उत्सुकता तर खूपच होती. कुर्गचे वातावरण खूपच आल्हाददायक आहे. इथला पावसाळा तर खूपच खतरनाक असतो. एकतर वळणावळणाचे डोंगरातून जाणारे अरुंद रस्ते आणि मुसळधार पाऊस यामुळे बाहेर निघणेही कठीण होऊन बसते असे मला काही स्थानिकांनी सांगितले. कूर्ग मधील पावसाचा थोडासा प्रत्यय मला बेंगळुरूहुन कुर्गमध्ये येत असतानाच आला होता. जणूकाही मुसळधार पाऊसधारांनी आमचे स्वागतच होत होते. सुदैवाने पावसाने पूर्ण सहलीत कोणताही व्यत्यय आणला नाही.

जेथे आम्ही राहत होतो त्या प्रशांती रिसॉर्ट मध्ये सुद्धा कॉफीची झाडे आणि मिरीचे वेल होते. कॉफीला लाल बेरी'ज लगडली होती. इथे रिसॉर्टमध्ये काही फुलांचे वेलही होते. त्याचे नाव माहित नाही पण दिसायला हि फुले पक्ष्यांसारखी दिसत, अगदी रंगीबेरंगी. त्याची प्रकाशचित्रे सोबत डकवत आहे. जाणकारांनी त्यावर प्रकाश टाकावा.




आता सुरुवात दुसऱ्या दिवसाची. सहलीच्या दुसऱ्या दिवशी आम्ही लवकर तयार होऊन स्थलदर्शन करायचे ठरवले होते. कारण एकतर हातात वेळ कमी होता आणि जमेल तेव्हढे स्थलदर्शन आम्हाला करायचे होते , अर्थात उगाचच भराभर स्थळे न पाहता फक्त मोजकी आणि महत्वाची स्थळेच पाहावीत असे आमचे सर्वांचे मत पडले आणि आम्ही निघालो आमच्या आजच्या पहिल्या स्थळाला भेट द्यायला , म्हणजेच मदिक्केरी किल्ला. 

मदिक्केरी किल्ला हा मदिक्केरी सिटीमध्येच आहे. आता तिथे शासकीय कार्यालय आहे. हलेरी वंशाचा राजा मुद्दुराजा याने मदिक्केरी इ.स. १६८१ मध्ये वसवले . त्यावेळी हे शहर मुदराजनकेरी या नावाने ओळखले जात असे. कालांतराने या नावाचा अपभ्रंश होऊन याचे मदिक्केरी असे नामकरण झाले. मदिक्केरी किल्ला मात्र कोडुगु वंशाच्या राजांनी बांधला. मूळचा मातीचा असलेला हा किल्ला पुढे टिपू सुलतानाच्या हातात आला. टिपूने ह्या किल्ल्याची ग्रॅनाईटच्या साहाय्याने पुनर्बांधणी केली आणि याचे नवीन नामकरण जफराबाद असे केले.



(किल्ल्याचे छायाचित्र आंतरजालावरून साभार) 

किल्ल्यात एक चर्चही आहे जे ईस्ट इंडिया कंपनीने इ.स. १८५९ मध्ये बांधले असल्याचा उल्लेख सापडतो . आता या इमारतीत कर्नाटक राज्याच्या पुरातत्त्व विभागाने संग्रहालय (म्युझियम) चालवले आहे. या संग्रहालयामध्ये आपल्याला मुद्दुराजा ते टिपू सुलतान व ब्रिटिश सरकार पर्यंतच्या पुरातन वस्तू प्रामुख्याने शस्त्रास्त्रे पहावयास मिळतात. वेळेअभावी आम्हाला हे संग्रहालय पाहता नाही आले त्यामुळे एक ऐतिहासिक वारस पाहण्याची संधी हुकल्याची रुखरुख मनास लागून राहिली. 

मदिक्केरी किल्ला पाहिल्यानंतर आमची मोहीम वळाली ते ओंकारेश्वर मंदिराकडे. कर्नाटकातील किंबहुना दक्षिण भारतातील मंदिरे पाहणे हि एक सांस्कृतिक मेजवानीच असते. अत्यंत सुंदर अशी ही मंदिरे बनवताना लागलेले कष्ट याची कल्पनाच न केलेली बरी. पण त्या मंदिरांवरची कलाकुसर पाहताना खरेच भान हरपून जाते. 

श्री ओंकारेश्वराचे मंदिर मदिक्केरी सिटीमध्येच आहे. मार्केटपासून काहि किमी अंतरावर असलेले हे सुंदर मंदिर आणि त्यासमोरचा जलाशय हे दृश्य खूपच मनोहारी आहे. मंदिर बरेच जुने असावे. शिवाचे हे मंदिर म्हणजे दाक्षिणात्य स्थापत्य शैलीचा एक उत्तम नमुना आहे. ओंकारेश्वराचा आशीर्वाद घेऊन आम्ही पोटपूजा करण्यासाठी उडुपी नावाच्या रेस्टॉरंट मध्ये आलो. उत्तम आणि रुचकर शाकाहारी जेवणासाठी हे ठिकाण एक छान पर्याय ठरू शकते. 

जेवण करण्यासाठी सिटीमधीलच उडुपी नावाचे एक छान आणि प्रशस्त आवार असलेले असे रेस्तरॉं आहे. पुन्हा दाक्षिणात्य जेवणाचा आस्वाद घेतला. पण या हॉटेल मध्ये छान उत्तर भारतीय आणि चायनीज पदार्थ सुद्धा मिळतात. एकूणच छान अनुभव होता. 



पोटोबा झाल्यानंतर आम्ही आबे फॉल्स म्हणजे आबे धबधबा पाहायला निघालो. मदिक्केरी सिटीजवळच असलेला हा मनोहारी धबधबा आवर्जून पाहण्यासारखाच आहे. संपूर्ण कूर्ग प्रवासात एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे प्रत्येक पर्यटनस्थळावर कचरा होऊ नये यासाठी चोख व्यवस्था होती. आमचा चालक प्रकाश सुद्धा प्लास्टिक इतस्ततः न फेकण्याबद्दल सजग होता. आमच्याजवळील प्लास्टिक बॉटल्स आणि प्लास्टिक रॅपर्स सुद्धा तो आग्रहानं आमच्याकडून मागून कचरापेटीत टाकत असे. 

आबे धबधबा हा अतिसुंदर जंगलाने वेढलेला आहे. तिथे सुद्धा पर्यटकांची बरीच गर्दी दिसत होती. कावेरी नदीवरच असलेला हा धबधबा खूपच सुंदर दिसतो. येथे पाण्यात उतरण्यास परवानगी नाही. कोणी पाण्यात उतरू नये म्हणून संरक्षक जाळ्या बसवण्यात आल्या आहेत. पर्यटकांना धबधबा नीट पाहता यावा यासाठी मचाणाची व्यवस्थाही आहे. एकंदर धबधब्याची व्यवस्था खूपच छान रीतीने करण्यात आली आहे. 



आबे धबधबा पाहण्यास थोडा जास्त वेळ लागला असल्याने त्वरित तळकावेरी साठी निघालो. तळकावेरी हे उंचावर स्थित असलेले कावेरी नदीचे उगमस्थान आहे. मदिक्केरी पासून साधारण ४० किमीवर असलेले तळकावेरी ब्रह्मगिरीच्या उंच डोंगरांमध्ये वसलेले आहे. तळकावेरीच्या रस्त्यावरच भागमंडला हे भागंडेश्वराचे म्हणजेच महादेवाचे सुंदर व प्राचीन मंदिरसुद्धा आहे. 


(भागमंडला मंदिराचे छायाचित्र आंतरजालावरून साभार)

तळकावेरी मंदिर परिसर हा खर्च खूप सुंदर आणि मनोरम आहे. हवेत अजूनही गारवा आणि धुके दिसत होते. मंदिराच्या आवारातून मदिक्केरीचे दर्शन होते. मंदिराची व्यवस्था सुद्धा खूप सुंदर आहे. कावेरी नदीला म्हणजेच "कावेरम्माला"कर्नाटकात खूपच जिव्हाळ्याचे स्थान आहे. कर्नाटकाची जीवनदायिनीच असलेली कावेरी नदी आणि तिचे उगमस्थान पाहताना मनात एक पवित्र भावना उमटली. आपोआपच माझे हात कावेरी मंदिरासमोर जोडले गेले. 

तळकावेरी स्थान पाहून अगदी आपल्या महाबळेश्वरचीच आठवण झाली. अगदी तसाच नयनरम्य परिसर, नागमोडी वळणे आणि थंड गुलाबी हवा असे अगदी रोमांचक वातावरण आपल्याला महाबळेश्वरचीच आठवण करून देते.


(कावेरी मंदिराचे छायाचित्र आंतरजालावरून साभार) 

तळकावेरीहून मदिक्केरीला येताना एक कॉफी प्लांटेशन फार्म आहे त्यास भेट द्यावी असा आमच्या चालकाचा आग्रह होता. आम्हालाही कॉफीच्या शेतीविषयी माहिती हवी होतीच. मग काय दिली भेट त्या फार्मला. 
"Pappy's Coffee Island" असे नाव असलेल्या त्या फार्ममध्ये आम्ही शिरलो. येथे कॉफी प्लांटेशन आणि कूर्ग मधील इतर मुख्य शेतीबद्दल माहिती दिली जाते. यासाठी माणशी रु. २०० आकारले जातात. प्रथमतः हे थोडे महाग वाटेल पण अनुभव लाखमोलाचा मिळतो एवढे निश्चित. पैसे भरल्यानंतर आमची भेट आमच्या मार्गदर्शकासोबत घालून देण्यात आली . काही पर्यटक अगोदरच तिथे होते. मार्गदर्शक हा खरंच खूप ज्ञानी असावा कारण तो आमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर व्यवस्थित आणि हजारजबाबीपणे देत होता. 

या फार्म मध्ये कॉफीच्या "रोबस्टा" आणि "अरेबिया " या जातींबद्दल माहिती देण्यात आली. तसेच चिकोडी या नवीन पदार्थाबद्दल ऐकायला मिळाले जो एका रानवनस्पतीच्या मुळापासून बनतो आणि ओरिजिनल कॉफीमध्ये प्रमाण वाढवण्यासाठी मिक्स केला जातो. या चिकोडीचा अरोमा किंवा सुगंध अगदी कॉफी सारखाच असतो आणि आजकाल चिकोडीच्या कॉफीमधील प्रमाण बऱ्याचशा कॉफीच्या उत्पादनावर छापले जाते. या चिकोडीमध्ये कोणतेही उत्तेजक सापडत नाही हाच काय तो मूळ कॉफी आणि चिकोडीमधील फरक. या जागी बरीच नवीन झाडे उदा. कोको, कुर्गचे संत्र, तसेच रातांबा(कोकम)ची नर व मादी झाडे जी एकमेकांपासून ठराविक अंतरावर असतील तरच दोन्ही झाडांना फळ धरते असे आम्हाला सांगण्यात आले. जाणकारांनी यावर प्रकाश टाकावा हि विनंती. इलायची, मिरी, ऍव्होकॅडो , अश्या अनेक प्रकारच्या वनस्पती या प्लांटेशन फार्म मध्ये आहेत. अगदी सफरचंदाचे ४-५ वर्षांपूर्वी यालंगवाद केलेले आणि फळाची वाट पाहत असलेले झाडंही आम्हाला पाहावयास मिळाले. कूर्ग मध्ये सफरचंदाचे झाड पाहण्याचा अनुभव हा लाखमोलाचाच होता. याव्यतिरिक्त जगातील तिखटपणामध्ये दुसऱ्या क्रमांकावर असलेली गांधारी मिरची, दालचिनी, कोकोचे बीज अश्या अनेक वनस्पती आम्हाला पाहावयास मिळाल्या. हे पाहून खरेच अनुभवसमृद्ध झाल्यासारखे वाटले. कुर्गमध्ये गेल्यास या ठिकाणास जरूर भेट द्यावी. मस्ट सी असे हे ठिकाण आहे याबद्दल माझ्या मनात दुमत 
नाही. 
ऍव्होकॅडो 

आता सूर्यास्त झाला होता म्हणून आमच्या रेसॉर्टकडे प्रस्थान केले. आजचा दिवस खरेच सार्थकी लागला होता. खूप छान छान अनुभव सोबत होते. त्यामुळे दिवसाची सांगताही खूप छान झाली होती. उद्याचा दिवस आमचा कुर्गमधील शेवटचा दिवस असणार होता. त्यामुळे जमेल तेवढे अनुभव शिदोरीत बांधून ठेवत होतो. उद्या मैसूर ला जायला निघणार होतो. त्यामुळे सामान पॅक करणे क्रमप्राप्त होते. सर्व सामान बांधून झाल्यावर छानपैकी सुग्रास भोजन झाले आणि बेडवर ताणून दिली. 










Friday, January 10, 2020

कूर्ग डायरीज ४


कूर्ग डायरीज ४

दिवस पहिला:

सूर्य उगवायच्या आतच मला जाग आली. आज कूर्ग मधील आमची ही पहिलीच सकाळ. रात्री छान झोप झाल्याने ताजे तवाने वाटत होते. बाहेर येऊन पहिले तर बाहेरचे दृष्य खूपच विहंगम होते. सगळीकडे अगदी घनदाट धुक्याची चादर ओढली गेली आहे असे वाटावे इतके सुंदर दृष्य होते ते. असे वाटत होते की जणू काही आपण आकाशातील ढगांमध्येच संचार करीत आहोत. हे दृष्य पाहून मुलींना उठवले हा अनुभव घेण्यासाठी. त्याही खूप खुश झाल्या ते धुके पाहून.

सर्व विधी आटपून नाश्त्यासाठी रिसॉर्टच्या किचनजवळ आलो. नाश्ता खूपच चविष्ट होता. गरम गरम इडल्या, मेदुवडा आणि डोसा असे टिपिकल दाक्षिणात्य नाश्त्याचे प्रकार जरी असले तरी सुद्धा खूपच चविष्ट होते. नाश्त्याचा फडशा पडून पुढील मार्गक्रमण करण्यासाठी आमच्या ड्राइव्हर प्रकाशशी संपर्क केला आणि कुर्गमधील आमच्या पहिल्यावहिल्या पर्यटनस्थळाला भेट देण्यास आम्ही सज्ज झालो.

राजा'ज सीट :


कूर्ग मध्ये आम्ही पाहिलेले पहिले स्थळ म्हणजे राजा'ज सीट. हे एक सुंदर उद्यान असून सशुल्क असल्याने खूप छान मेंटेन केले गेले आहे. विस्तीर्ण असा परिसर, फुलांची सुंदर बाग , वाघ, हरीण,जिराफ ,हत्ती अश्या प्राण्यांचे पुतळे आणि आल्हाददायी हवा असे अद्भुत कॉम्बिनेशन म्हणजे राजा'ज सीट हे स्थळ. शनिवार असल्याने आणि नाताळच्या सुट्ट्यांमुळे अपेक्षित गर्दी होतीच. स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार येथे कूर्गचे शासक सूर्योदय आणि सूर्यास्ताचे मनमोहक दर्शन करण्यासाठी येत असत. त्यांच्या आसनाची व्यवस्था म्हणजेच ही राजा'ज सीट . इथला सूर्योदय आणि सूर्यास्त खूपच मोहक असणार यात शंका नव्हती. दुर्दैवाने आमच्याकढे तेव्हढा वेळ नव्हता. राजा'ज सीट हा छायाचित्रकारांची पर्वणीच ठरेल कारण छायाचित्रणासाठी योग्य अशा बरयाच जागा तिथे आहेत. पण काही जागांवर छायाचित्रण किंवा गेलाबाजार सेल्फी काढणे जीवावर बेतू शकते. त्यामुळे आपल्या जीवाची काळजी घेऊनच असे प्रताप करावेत.


एकूणच विहंगम अश्या राजा'ज सीटला भेट देऊन बाहेरआल्यानंतर कुल्फी आणि खमंग ,चटकदार भेळीचा आस्वाद घेतला. अगदी मुंबईतल्या चौपाटीच्या फील आला. पण इथली भेळ खरंच खूप चवदार होती. जोडीला आम्ही कैरी आणि अननसाचे तिखटमीठ लावलेले चाट घेतले जे आंबटगोड चवीचे अफलातून कॉम्बिनेशन होते.

राजा'ज सीट पाहून आम्ही ठरल्याप्रमाणे डुब्बारे फॉरेस्ट ला निघालो. डुब्बारे फॉरेस्ट हे कूर्ग सहलीतील महत्त्वाचे पर्यटनस्थळ. कारण इथे रिव्हर राफ्टिंग तसेच एलिफंट सफारीचा आनंद घेता येतो. डुब्बारे फॉरेस्ट ला पोचल्यानंतर पाहिले तर आज अपेक्षेपेक्षा जास्त प्रमाणात गर्दी दिसत होती. बऱ्याचशा  स्थानिक शाळाहि सहलीसाठी मुलांसह आल्या होत्या. आम्ही पोहोचलो तेव्हा दुपारचे साधारण दोन ते अडीच वाजले होते. एलिफन्ट सफारी साडेचार वाजता सुरु होणार होती म्हणून प्रथमतः रिव्हर राफ्टिंगचे तिकीट काढले.


आयुष्यात पहिल्यांदा प्रॉपर रिव्हर राफ्टिंग करणार होतो तेही पूर्ण कुटुंबासमवेत. त्यामुळे नाही म्हणले तरी पोटात गोळा आला होता. सेफ्टी किट घालून आमची बोट कावेरी नदीच्या पात्रात उतरली आणि पोटातला गोळा थोडा मोठा झाला. आमच्याबरोबर अजून एक युगुल होते. म्हणजे आम्ही पाच जण , ते युगुल आणि आमचा मार्गदर्शक पवन असे आठ जण बोटीत होतो. मी, बायको आई ते युगल असे चौघे आणि मार्गदर्शक पवन असे नाव वल्हवणार होतो. माझी आई पहिल्यांदा असे काही धाडस करणार होती, त्यामुळे ती प्रचंड उत्साहित होती. आम्ही नाव वल्हवण्यास सुरुवात केली आणि हळूहळू नदीच्या पात्राच्या मध्यभागी आलो. नदीचे विस्तीर्ण पात्र मध्यभागातून खूपच सुंदर दिसत होते. नाव वल्हवणे किती कठीण काम असते हे क्षणाक्षणाला प्रत्ययास येत होते. हात भरून येण्यास सुरुवात झालीच होती. पण एकंदर खूपच मज्जा येत होती नाव वल्हवण्यास. आमचा मार्गदर्शक पवन यास हिंदीसुद्धा येत असल्याने भाषेचा प्रॉब्लेम नव्हता. तो आम्हाला खूप मस्त समजावत होता. वेळोवेळी काही ठिकाणी जाऊन छायाचित्रण करण्यास सांगे. ते लाईव्ह क्षण टिपणे हे खरेतर अलौकिकच. आम्हाला त्याने काही ठिकाणी पोहोण्यास सुद्धा सांगितले पण पर्यायी कपडे आणले नसल्याने आम्ही तो विचार टाळला. साधारण अर्ध्या तासाच्या रपेटीनंतर आम्ही किनाऱ्यास लागलो. रिव्हर राफ्टिंग नंतर एलिफंट सफारीचा बेत होता पण गर्दी खूप होती. एलिफन्ट सफारीसाठी पात्र ओलांडून पलीकडच्या जंगलात जायचे होते. त्यासाठी सरकारी बोटींची व्यवस्था असते. या बोटीतून पलीकडे जात येते. पण रांग खूप असल्याने आम्ही तो बेत रद्द केला. आता आम्ही निसर्गधाम ला जाण्याचे ठरवले.

भूक लागली होतीच. ड्रायव्हरच्या सल्ल्यानुसार जवळच असलेल्या आर्यन किंवा तत्सम नावाच्या हॉटेलला भेट दिली. मुळात ज्या ठिकाणी आपण भेट देतो तिकडच्या स्थानिक खाद्यप्रकारांचा नक्कीच आस्वाद घ्यावा अश्या मताचा मी आहे. प्रत्येक ठिकाणाची एक खासियत असते मग ती खाद्यप्रकाराच्या स्वरूपात असू शकते किंवा इतर काही. प्रत्येक पर्यटनस्थळांची आपली अशी एक खाद्यसंस्कृती सुद्धा असते आणि तिचा आस्वाद घेणे हे प्रत्येक पर्यटकांचे आद्य कर्तव्य आहे असे मी समजतो. दक्षिणेत जाऊन उत्तरेतील खाद्यप्रकार खाणे शक्यतो टाळावे. अर्थात चांगले स्थानिक खाद्यप्रकार मिळणे हे ज्याच्या त्याच्या नशिबावर किंबहुना अनुभवावर अवलंबून आहे. पण एखाद्या पर्यटकाला जर स्थानिक रेसिपीज चाखायच्या असतील तर थोडे संशोधन करून घरगुती अन्न मिळण्याची ठिकाणे पालथी घालणे गरजेचे आहे . कारण बरेचसें स्थानिक अन्नपदार्थ हॉटेल मध्ये नाही मिळत किंवा त्यांची ऑथेंटिक चव हॉटेलमध्ये न मिळता एखाद्या घरी मिळू शकते.

तर आम्ही या हॉटेलमध्ये पारंपरिक दक्षिण भारतीय थाळी मागवली. दक्षिणेत भात हा मुख्य खाद्यपदार्थ. त्यामुळे ताटातील बहुतांश गोष्टी या भाताशी संलग्न होत्या. सांबार भात तर अप्रतिम होता. गरम गरम भात आणि चवदार सांबार.... भन्नाटच ! जेवण होईस्तोवर संध्याकाळचे साडेचार वाजले होते.

निसर्गधाम हे ठिकाण मदिक्केरी सिटीपासून साधारण ४० किमींवर आहे. आम्हाला तेथे पोहोचेपर्यंत सव्वापाच झाले होते. ड्रायव्हर ने सानित्याप्रमाणे निसर्गधाम हेसुद्धा एक लोकप्रिय स्थळ आहे. निसर्गधाम हे एक मानवनिर्मित जंगलच आहे. येथूनच कावेरी नदीचा एक प्रवाह सुद्धा जातो. आम्ही तिकीटं काढून आत जायला सज्ज झालो. आत प्रवेश करताच कावेरीची दर्शन होते. सुरुवातीलाच नदीवरचा झुलता पूल पार करावा लागतो आणि जंगलात आपण प्रवेश करतो. निसर्गधाम मध्ये बांबूचे विस्तीर्ण जंगल आहे. पाहावे तिकडे बांबूची बेटे . मदिक्केरीच्या पारंपरिक वेशातील जनजीवन निसर्गधाम मध्ये मूर्तिस्वरूपात निर्माण केले गेले आहे. काही ठिकाणी रोप क्लाइंबिंग किंवा तत्सम धाडशी खेळ सुद्धा मुलांसाठी आयोजित करण्यात आले होते. पण निसर्गधामचे मुख्य आकर्षण म्हणजे कावेरीच्या पात्रातील बोटिंग.


आम्ही अगोदरच रिव्हर राफ्टिंग केले असल्याने आम्हाला बोटिंग मध्ये एव्हढा रस नव्हता. पण एका ठिकाणी नदीचे पात्र उथळ होते तेथे बरेच लोक पोहोण्याचा आणि पाण्याचा आनंद लुटत होते. मुलींचीही इच्छा होती पाण्यात खेळण्याची .... मग काय नेकी और पूछ पूछ! गेलो पाण्यात. तासभर पाण्यात खेळलो . पाणी खूप थंड होते तरीही मुली खुशाल खेळात होत्या. ते पाहूनच मज्जा येत होती. साधारण तासाभरानंतर अंधार पडण्यास सुरुवात झाली आणि पर्यटकांची पांगापांग झाली तसे आम्हीही बाहेर पडलो आणि रिसॉर्टवर परतण्यास तयार झालो. निसर्गधामचा सुंदर अनुभव घेऊन आणि ते विहंगम स्थळ डोळ्यात साठवून आम्ही निसर्गधामच्या शॉपिंग सेंटरमध्ये प्रवेश केला. स्वस्त आणि मस्त अश्या वस्तू हे या शॉपिंग सेन्टरचे वैशिष्ट्य. निसर्गधामच्या तिकीट खिडकीजवळच हे प्रशस्त शॉपिंग सेन्टर आहे. मनसोक्त खरेदी करून आम्ही परतीची वाट धरली. एव्हाना रूमवर पोचेपर्यंत आठ वाजले होते. मस्तपैकी चहा घेतिला आणि फ्रेश होऊन जेवण मागवले.

थकलो होतोच त्यामुळे जेवण झाल्यावर तडक बेड गाठला. कधी झोप लागली हे कळलेच नाही आणि कुर्गमधील दुसऱ्या दिवसासाठी सज्ज झालो.